भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलन; शेतकऱ्यांची मोजणी कामे ठप्प, हजारो प्रकरणे प्रलंबित
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
प्रतिनिधी: कुलदीप मोहिते, कराड
भूमी अभिलेख विभागातील भूमापक, परीक्षक भूमापक आणि शिरस्तेदार या पदावरील कर्मचाऱ्यांचा गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला काम बंद आंदोलन आता तीव्र होत चालला आहे. यामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यातील शेतजमिनी मोजणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, सामान्य शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत.
या आंदोलनामुळे कराड, सातारा, पाटण, कोरेगाव, जावली, महाबळेश्वर, खटाव, वाई, खंडाळा, फलटण या तालुक्यांतील तब्बल ४,५९५ मोजणी कामे प्रलंबित आहेत. या तालुक्यांमध्ये कराडमध्ये सर्वाधिक ५५४, सातारा ८८४, खटाव ६४९, वाई ५०५ प्रकरणे रखडली आहेत.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांना तांत्रिक अधिकाऱ्यांचा दर्जा द्यावा
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन लागू करावे
२०१९ मध्ये प्रशासकीय न्यायाधिकरणाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करावी
२०१४ मधील संप काळातील अनुपस्थिती अर्जित रजेमध्ये गणावी व त्या काळाचे वेतन मंजूर करावे
वाढलेल्या ऑनलाईन प्रकल्पांनुसार रिक्त पदे तातडीने भरावीत
या मागण्यांसाठी कर्मचारी आंदोलन करत असून, त्याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत आहे. आधीच नैसर्गिक आपत्ती, मान्सूनपूर्व पावसामुळे मोजणी कामे रखडत असताना, कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडथळे आणखी वाढले आहेत.
शिवाजी पाटील, जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती शेतकरी संघटना यांनी सांगितले की, “सामान्य शेतकरी आधीच तांत्रिक अडचणींना सामोरे जात आहे. आता कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मोजणीसाठी महिनोन्महिने वाट पाहावी लागते आहे. शासन आणि कर्मचारी संघटनांनी लवकर तोडगा काढावा, अन्यथा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.”
राज्य शासन आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुरु असलेली चर्चा लवकर निष्पन्न व्हावी आणि मोजणीची कामे सुरळीत व्हावीत, हीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.