वर्षानुवर्षे दुष्काळाच्या चटक्यांनी होरपळलेल्या या दुर्लक्षित भागाचे भाग्य बदलण्याचे शिवधनुष्य माण – फलटण मतदारसंघाचे तत्कालीन *आमदार दिवंगत धोंडीरामजी वाघमारे* यांनी लीलया पेलले व त्यांच्याच कार्यकाळात आजच्याच दिवशी म्हणजे *११ फेब्रुवारी १९९७ साली भाजप – शिवसेना युतीच्या सरकारने उरमोडी – जीहे – कठापुर पाणी योजनेस प्रशासकीय मान्यता दिली.*
लहानपणापसूनच माण तालुक्यातील पाण्याचे दुर्भिक्ष प्रत्यक्ष अनुभवलेले असल्यामुळे १९९० साली प्रथमतःच आमदार म्हणून निवडून गेलेल्या आमदार धोंडीरामजी वाघमारे यांनी त्यांच्या आयुष्याचे लक्ष्य हे केवळ माणदेशात पाणी आणून हा संपूर्ण भाग दुष्काळमुक्त करणे हेच ठरविले होते. आणि केवळ त्यामुळेच *पहिल्यांदा १९९० साली व त्यानंतर १९९५ साली समोरून चालून आलेल्या मंत्रिपदाला विनम्रपणे नकार देत माणदेशाच्या पाणीप्रश्र्नाला प्राधान्य दिले व मंत्रिपदापेक्षा मला माझा माण तालुका पाण्याने समृद्ध होवून सुजलाम सुफलाम झाल्याचे बघायचे आहे हे विधानसभेमध्ये अनेकदा ठणकावून सांगितले होते.*
आनंदाची बाब म्हणजे येत्या १९ फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन व आंधळी धरणाचे जलपूजन होत आहे. या दोन्ही मोठ्या योजना पूर्णत्वास येण्यास अनेक वर्षे लागल्यामुळे कदाचित माण खटाव मधील नवीन पिढीला आपल्या भागात पाणी आणण्यासाठी अविरत झटलेल्या धोंडीराम वाघमारे नामक आधुनिक भगीरथाचे विस्मरण होवूही शकते कारण या कामाचे श्रेय घेण्याची सध्या अनेक लोकांमध्ये अहमहिका लागलेली पाहण्यात येत आहे. त्यात आक्षेप घेण्याचे काही कारण नाही. मात्र या योजनांच्या जन्मदात्याला अजिबात विसरून चालणार नाही.
वरील योजनांप्रमाणेच आंधळी धरण, ढाकणीचा तलाव, अनेक नळपाणी योजना अश्या अनेक योजनांचे जन्मदाता हे धोंडीरामजी वाघमारे हेच आहेत हे इथे जन्म घेतलेल्या नवीन पिढीला कळलेच पाहिजे. २५-३० वर्षांपूर्वी विशीत असणाऱ्या व आज वयाची पन्नाशी गाठलेल्या प्रत्येक माणदेशी माणसाला याची निश्चितपणे माहिती व जाणीव आहेच व आता आपल्या पुढील पिढीला धोंडीराम वाघमारे यांनी केलेल्या भगीरथ प्रयत्नांची माहिती देणं हे आपल्या सर्वांचे कर्तव्यच आहे.
*माण व खटाव तालुक्याचे खरे जलदाता धोंडीरामजी वाघमारे यांच्या या महान जलकार्याला आम्हां समस्त माण – खटाव वासियांकडून कोटी कोटी सलाम