व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला दहिवडी (जि. सातारा) –
जिल्ह्यातील मालमत्तेवर व शरीराविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत गावांमध्ये जलद मदत मिळावी यासाठी ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे राबवली जात आहे. या यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व जनजागृतीसाठी सोमवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता बालाजी मंगल कार्यालय, गोंदवले रोड, दहिवडी येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे.
ही बैठक माननीय पोलीस अधीक्षक, सातारा व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आदेशानुसार घेतली जात असून, दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नगरपंचायत व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गावातील प्रमुख मंडळी, अंगणवाडी सेविका, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील आणि पत्रकारांना या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामसुरक्षा यंत्रणेचा उपयोग चोरी, दरोडा, आग, जळीत, लहान मुले हरवणे, शेतातील पिकांची चोरी, गंभीर अपघात, वन्य प्राणी हल्ला, पूर, भूकंप अशा आपत्कालीन घटनांमध्ये गावाला सुरक्षित ठेवण्यासाठी होतो. संकटाच्या वेळी गावकऱ्यांना एकाच वेळी सूचना देणे, त्यांना सतर्क करणे आणि त्वरित मदत मिळवून देण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे या बैठकीत ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या प्रभावी वापराबाबत माहिती देण्यात येणार आहे.
सदर बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, दहिवडी पोलीस स्टेशन यांनी केले आहे.