ग्रामीण भागातील गावे व शहरे स्वच्छ व सुंदर होण्यासाठी माझी वसुंधरा अभियान 4.0 प्रभावीपणे राबवावे. हे अभियान राबविताना जास्तीत जास्त नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात माझी वसुंधरा अभियान 4.0 आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपायुक्त नगर पालिका प्रशासन पुनम मेहता, टंचाई निवारण नोडल ऑफीसर निलीमा धायगुडे, नगर प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील, नगर परिषदांचे मुख्याधिकारी व गट विकास अधिकारी उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियानाचा लाभ शहरी व ग्रामीण भागात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला झाला पाहिजे, असे सांगून आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी लावणे आपल्या हातात आहे. गावे व शहरे स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करा. या अभियानात शहरी व ग्रामीण भागातील शाळेंच्या नोंदी कराव्यात. नोंदी झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा.
ग्रामीण भागातील गायरान जागेवर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. मागील वर्षी ज्या गावांनी व शहरांनी माझी वसुंधरा अभियानात नामांकन प्राप्त केले होते त्यांनी नामांकन टिकविण्यासाठी पूर्ण वर्षभर हे अभियान राबवावे. या पुढे बैठक न घेता माझी वसुंधरा अभियानात सहभागी गावांची व शहरांची प्रत्यक्ष पहाणी करणार असल्याचेही आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.
बैठकीच्या प्रारंभी शहरी व ग्रामीण भागात माझी वसुंधरा अभियान कशा प्रकारे राबविण्यात येणार आहे याची माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली.