अजून किती दिवस म्हसवड, दिवड व धुळदेव परिसरातील रस्ता खराब अवस्थेत ठेवणार ? : प्रा. विश्वंभर बाबर
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक:अहमद मुल्ला )
म्हसवड… प्रतिनिधी
सातारा पंढरपूर राज्य महामार्ग दरम्यानच्या मौजे दिवड तालुका माण हद्दीतील अत्यंत खराब रस्त्याला जबाबदार कोण ? अजून किती दिवस म्हसवड, दिवड व धुळदेव परिसरातील रस्ता खराब अवस्थेत ठेवणार ? असा सवाल किसान काँग्रेस पुणे विभागाचे उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केला आहे.
सातारा पंढरपूर राज्य मार्गाच्या रस्त्याचे काम नुकतेच ठेकेदाराने रडतखडत पूर्ण केले.या रस्त्याच्या दर्जेदारपणाबद्दल अनेक शंका कुशंका आहेत.सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यात त्यासंबंधी तक्रारी होत आहेत.माण तालुक्यात सुद्धा या रस्त्याच्या दर्जाबद्दलअनेक ठिकाणी शंका निर्माण झालेली आहे.
या राज्य महामार्गावर मौजे दिवड गावाच्या हद्दीत साखळी पुल ते दिवड बस स्थानक दरम्यान दोन ठिकाणीचा मिळून अंदाजे एक किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे उघडलेल्या अवस्थेत असून यामुळे वाहनधारक व प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
भीक नको पण कुत्रं आवर अशी अवस्था प्रवासी व नागरिकांची झालेली आहे. या रस्ता कामासाठी शासनाच्या काही कोटी रुपयाची नासाडी कशासाठी ? मूळ रस्ता बरा होता अशी म्हणण्याची वेळ आता निर्माण झालेले आहे. आज पावसाळा कालावधीत नवीन तात्पुरती डांबरी मलमपट्टी शक्य नाही . मात्र किमान त्या ठिकाणचे खड्डे मुरूम टाकून मुजवल्यास वाहनधारकांना तात्पुरता दिलासा देणे शक्य आहे. सदर एक किलोमीटरच्या रस्त्याची इतकी वाट लागलेली आहे की त्यावरून जाताना महागड्या गाडीची व गाडीत बसलेल्या
प्रवाशाच्या शरीराचा अक्षरशः खुळखुळा झाल्याशिवाय राहत नसल्याचे प्रा. बाबर यांनी स्पष्ट केले.
सातारा पंढरपूर राज्य मार्गाचे काम ठेकेदाराने काही अंशी पूर्ण केले मात्र अनेक ठिकाणी ते अपुऱ्या अवस्थेतही आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झालेले आहे. मौजे धुळदेव गावां नजीक रस्ता भेगाळलेला असून त्या परिसरातही अनेक स्पॉट कच्च्या स्वरूपात कामाविना असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. माण तालुक्यातील या राज्य मार्गाच्या झालेल्या कामातील निकृष्ट दर्जाबद्दल, याबरोबरच अपूर्ण कामाबद्दल येथील लोकप्रतिनिधी तसेच स्वतःला ज्येष्ठ नेते म्हणणारे ,तसेच आमदारकी साठी बाशिंग बांधून तयार असणारे मतदार संघातील विविध राजकीय पक्षातील बडी धेंडे गप्प का आहेत ? ठेकेदाराविरोधात बोलण्यासाठी नेतेमंडळी ब्र शब्द का काढत नाहीत , या पाठीमागील गौड बंगाल काय ? तोड पाण्याच्या नावाखाली तेरी चूप मेरी चूप हा प्रकार तर नाही ना ? असा प्रश्न प्रा. बाबर यांनी उपस्थित केला. या खराब रस्त्यावरून लोकप्रतिनिधी तसेच स्वतःला नेते समजणाऱ्यांची वाहने जात नाहीत का ? प्रवाशांना होणारा त्रास या मंडळीच्या लक्षात येत नाही का ? अजून किती दिवस म्हसवड, दिवड व धुळदेव परिसरातील रस्ता खराब अवस्थेत ठेवणार ? याबाबत आता लोकप्रतिनिधी बरोबरच आमदारकीचे डोहाळे लागलेल्या सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांना खडसावून विचारण्याची गरज निर्माण झालेली आहे .या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आपण स्वतःजिल्हाधिकारी सातारा यांना दोन वेळा पत्र देऊन संबंधित यंत्रणेला आदेश करण्याची विनंती केली मात्र त्यातून काही निष्पन्न झालेले असल्याचे स्पष्ट केले.
सातारा पंढरपूर राज्य महामार्गावरील प्रवासासाठी अत्यंत त्रासदायक ठरलेले माण तालुक्यातील उर्वरित रस्ता दुरुस्तीचे काम मार्गी लावण्याचे आवाहन विश्वंभर बाबर यांनी केले आहे.