येणाऱ्या काळात ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधा सुधारण्यावर भर देणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार गरिबांना घरकुल मिळण्यासाठी १०० दिवसात २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प ग्रामविकास पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज केला.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज मंत्रालयात मंत्रीपदाचा पदभार घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार राहुल दादा कुल,आमदार सचिन कांबळे-पाटील, अरुण गोरे (आबा) , धैर्यशीलदादा कदम,मंत्री गोरे यांच्या पत्नी सोनिया गोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
मंत्री श्री गोरे यांनी सपत्नीक मंत्रालयातील मुख्य प्रवेशद्वाराजवळील महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करून पदभार घेतला. यावेळी बोलताना ते म्हणाले, ग्रामीण भागात काम करण्याची संधी मिळाल्याने मंत्रीपदाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पना राबवून खात्याचे नाव उंचावणार आहे. १०० दिवसांचा कार्यक्रम समोर ठेवून काम करणार असून प्रथमच राज्याला २० लाख घरांचे उद्दिष्ट मिळाले आहे. १०० दिवसात या घरांना मान्यता देवून काम चालू करणार आहे.
शिवाय पंतप्रधान यांची महत्वाकांक्षी योजना लखपती दीदी कार्यक्रम १०० दिवसात करण्याचा संकल्प आहे. ग्रामीण भागातील महिलांचे बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करण्यासाठी ५० लाख अतिरिक्त लखपती दिदी करणार असल्याचेही मंत्री श्री गोरे यांनी सांगितले.