माण तालुक्यात फळबाग लागवडीसाठी लक्षांक वाढवण्याची मागणी — प्रा. विश्वंभर बाबर यांचे कृषिमंत्र्यांकडे निवेदन
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
म्हसवड, ता. माण | प्रतिनिधी
माण तालुक्यातील शेतकऱ्यांचा फळबाग लागवडीकडे वाढता कल लक्षात घेता, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा शासकीय लक्षांक वाढवावा, अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि कृषिरत्न पुरस्कार प्राप्त प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.
मुंबई मंत्रालयात नुकतीच पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी महासंघाच्या बैठकीदरम्यान ही मागणी अधिकृतरित्या कृषिमंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे करण्यात आली. यावेळी राज्याचे प्रधान कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, तसेच कृषी विभागाचे अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
प्रा. बाबर यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, मागील काही वर्षांपासून माण तालुका पर्जन्यछायेतील, दुष्काळग्रस्त आणि दुर्लक्षित तालुका म्हणून ओळखला जात होता. मात्र, आता परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे. विविध सिंचन योजनांमधून मिळालेल्या पाण्यामुळे शेतीस चालना मिळाली असून, यंदाचा पावसाळाही समाधानकारक झाला आहे.
या पार्श्वभूमीवर माण तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पिकांच्या तुलनेत आंबा, डाळिंब, द्राक्ष इत्यादी फळपिकांकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत. त्यामुळे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र, विभागाने जाहीर केलेला लाभार्थी लक्षांक अत्यंत अल्प असून, तो मागणीच्या तुलनेत खूपच कमी असल्याने अनेक इच्छुक शेतकरी या योजनेपासून वंचित राहत आहेत.
तसेच, प्रा. बाबर यांनी तालुक्यातील शेततळी बांधकामासाठी विशेष प्राधान्य देण्याची आणि अस्तरीकरणासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याची गरज अधोरेखित केली. या मागण्यांमुळे तालुक्यात जलसंधारण आणि जलव्यवस्थापन सुधारून बागायती शेतीस अधिक मदत होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कृषिमंत्री कोकाटे यांनी प्रा. बाबर यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून घेतले आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाहीचे आदेश दिले. यामुळे माण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
“फळबाग लागवडीचा इष्टांक वाढवून दिल्यास माण तालुक्यात आर्थिक स्थैर्य आणि कृषी उत्पादनात वाढ होईल,” असा विश्वास प्रा. विश्वंभर बाबर यांनी यावेळी व्यक्त केला.