“मराठी अस्मितेसाठीचा लढा” – राज ठाकरेंनी त्रिभाषा सूत्राला केला जोरदार विरोध
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक:अहमद मुल्ला)
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकारच्या त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीच्या निर्णयाने राज्यात नव्या वादाला तोंड फोडले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत या निर्णयावर जोरदार टीका करत, याला मराठी अस्मितेवरचा आघात ठरवले.
“हा लढा केवळ भाषेपुरता मर्यादित नाही, तर मराठी अस्मितेसाठीचा लढा आहे,” असे ठाम मत व्यक्त करत राज ठाकरेंनी सरकारच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. त्यांनी असा सवाल उपस्थित केला की, “गुजरातसारख्या भाजप शासित राज्यात तिसरी भाषा सक्तीची नसेल, तर ती केवळ महाराष्ट्रातच का लादली जाते?”
शासनाच्या नव्या निर्णयानुसार मराठी शाळांमध्ये आता तीन भाषा शिकवण्यात येणार आहेत — मराठी, इंग्रजी आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार निवडलेली तिसरी भाषा. ही तिसरी भाषा कोणतीही भारतीय भाषा असू शकते, परंतु ती शिकवण्यासाठी किमान २० विद्यार्थ्यांची मागणी असावी लागणार आहे.
हिंदीचा उल्लेख ‘ऐच्छिक’ असला तरी राज ठाकरेंनी या भूमिकेवर आक्षेप घेत म्हटले, “दोन महिन्यांपूर्वी सरकारने हिंदी सक्ती न करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. मात्र कालच्या निर्णयाने पुन्हा मराठी विद्यार्थ्यांवर हिंदी लादण्याचा प्रकार दिसून येतो.”
राज ठाकरेंनी मराठी जनतेला आवाहन करत सांगितले की, “जर आज आपण गप्प बसलो, तर उद्या आपली मराठी भाषा नामशेष होईल. त्यामुळे सगळ्यांनी एकवटून या निर्णयाला विरोध करावा.” त्यांनी यासंबंधी सरकारला अल्टिमेटमही दिला आहे.
दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी यावर स्पष्टीकरण देत सांगितले की, त्रिभाषा सूत्रांतर्गत कोणतीही भाषा अनिवार्य केलेली नाही. “विद्यार्थ्यांनी निवड केल्यासच तिसरी भाषा शिकवण्यात येईल आणि त्यासाठी शिक्षकही नियुक्त केले जातील. तिसरी भाषा ही ऐच्छिक आहे, सक्तीची नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तथापि, याआधी भुसे यांनीच केलेले एक विधान — “यंदा पहिल्यापासून फक्त दोनच भाषा शिकवण्यात येतील” — हे या संपूर्ण प्रकरणात गोंधळ निर्माण करणारे ठरले आहे. त्यामुळे त्रिभाषा सूत्रावरून सध्या राज्यात राजकीय आणि सामाजिक चर्चेला उधाण आले आहे.