खत उत्पादक कंपनीचीअन्यायकारक लिंकिंग पद्धत बंद करा. ……..कृषिरत्न विश्वंभर बाबर

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड…प्रतिनिधी
     खत विक्रेत्याच्या माध्यमातून शेतीसाठी रासायनिक खत उत्पादन कंपन्या लिंकिंग पद्धतीने दुसरे दुय्यम खत देत असून सदर अन्यायकारक  लिंकिंग पद्धत  बंद करावी अशी मागणी माण तालुका कृषी पदवीधर संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे. 
     या बाबतचे लेखी निवेदन कृषिरत्न प्रा .विश्वंभर बाबर यांनी जिल्हाधिकारी सातारा कार्यालयास दिले आहे. विविध रासायनिक खत  कंपन्या मुख्य रासायनिक खताबरोबर लिंकिंग च्या माध्यमातून दुय्यम प्रकारचे खत,सूक्ष्म अन्नद्रव्य अथवा,  पिक संरक्षक  बॉटल अथवा पॅकिंग विक्रेत्यांना जबरदस्तीने देत आहेत. त्याचा फटका ग्रामीण भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला पुन्हा आर्थिक अडचणीत टाकण्याचे काम खत उत्पादक कंपन्या करीत आहेत.खत विक्रेते हे विविध खत उत्पादक कंपनीचे डीलर अथवा सब डीलर असतात त्यामुळे त्यांना कंपनीचा खत खरेदी व्यवहार तोंड दाबून बुक्क्याचा मार  सहन करण्याच्या स्वरूपात मान्य करावा लागतो.खत उत्पादक कंपनी लिंकिंग च्या माध्यमातून मुख्य खताबरोबर दुय्यम खत दुकानदाराच्या पर्यायाने शेतकऱ्याच्या माथी मारत आहेत. या प्रकाराचा प्रचंड आर्थिक भुर्दंड खत विक्रेत्याबरोबरच शेतकऱ्यांना सुद्धा सहन करावा लागत आहे.मुख्य रासायनिक खत पाहिजे तर दुय्यम खताची  गोणी ,सूक्ष्म अन्नद्रव्य पाकीट,पीक संरक्षक बॉटल,अथवा पॅकिंग घ्यावी लागेल असा अलिखित फतवा उत्पादक कंपनीने काढला असून त्यामुळे खत विक्रेते प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले असल्याचे दिसून येत आहे.
         अगोदरच  मुख्य रासायनिक खताच्या किमती आकाशाला भिडलेल्या आहेत.त्यातच लिंकिंग दुय्यम खताच्या किमती सुद्धा कंपनीने अवास्तवपणे आकारलेल्या आहेत.वास्तविक पाहता मुख्य रासायनिक खताच्या विक्री किमतीवरील  विक्रेत्याचे कमिशन खूपच अत्यल्प आहे. दुय्यम खताच्या विक्रीला शेतकऱ्याकडून विरोध तसेच नकार येत असल्याने  त्या खताची देणे बाकी खतविक्रेतेच्या अंगावर पडत आहे. पर्यायाने खत विक्रेत्याला प्रचंड आर्थिक ताण नव्हे तर तोटा सहन करावा लागत आहे. याबरोबरच खत वाहतुकीचा ज्यादा आर्थिक ताण सुद्धा खत विक्रेत्यांना सहन करावा लागत आहे. एका बाजूने शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य दरात रासायनिक खताची विक्री करायची  तर दुसऱ्या बाजूने कंपनीच्या दडपशाहीमुळे लिंकिंग च्या माध्यमातून आर्थिक ताणतणाव सहन करायचा प्रसंगी शेतकऱ्यांची नाराजी ओढावून घ्यायची या  व  इत्यादी प्रकारामुळे खत विक्रेते प्रचंड अडचणी सापडलेले आहेत.या सर्व प्रकारामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष विपरीत परिणाम सामान्य शेतकऱ्यांना सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
     केवळ खत विक्रेत्यासाठी नव्हे तर सामान्य शेतकऱ्या वर  अन्याय करणारी रासायनिक खता बरोबरची दुय्यम खत लिंकिंग पद्धत बंद करावी अशी मागणी कृषिरत्न  विश्वंभर बाबर यांनी केली आहे.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!