महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वांनी दक्ष राहावे….. सपोनि बिराजदार

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड…प्रतिनिधी
     महिला व शालेय मुलींच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी म्हसवड येथे केले.
       क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे महिला व शालेय मुली सुरक्षितता अभियान निमित्त वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहायक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, अभिजीत भादुले, रूपाली फडतरे, संतोष काळे हे पोलीस कर्मचारी तसेच, मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, प्राचार्य विन्सेंट जॉन , मुख्याध्यापक अनिल माने, क्रांतीवीर संकुलातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
     यावेळी बोलताना सपोनि सखाराम बिराजदार म्हणाले मुंबई बदलापूर येथील शालेय मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे महिला व मुलींच्या सामाजिक सुरक्षेला कलंक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एक नराधम कलंकित व्यक्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा गदारोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आपण सर्वांनी दक्ष राहणे गरजेचे आहे. समाज व्यवस्थेत शाळा हे महत्त्वाचे ठिकाण आहे. त्या ठिकाणी सर्व गुणसंपन्न नवीन पिढी घडवली जाते मात्र किरकोळ दुर्लक्ष केल्यास या सर्वांवर विपरीत परिणाम होतो. आदर्श शाळा व्यवस्थापन राहण्यासाठी प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्वच बाबतीत दक्ष राहणे गरजेचे आहे. कुठलाही अनुचित प्रकार झाकून,दाबून ठेवू नका, तातडीने पोलीस स्टेशनला माहिती द्या , शून्य मिनिटात आम्ही तुमच्या मदतीला येऊ अशी ग्वाही बिराजदार यांनी दिली.
      पुढे बोलताना सपोनि बिराजदार म्हणाले शाळा व्यवस्थापनात कोणत्याही चुकीच्या घटनेला पाठीशी घालू नका, टुकार प्रवृत्ती ठेचून काढण्यासाठी दक्ष रहा. शिस्त, सुरक्षितता याची काळजी घ्या. प्रामुख्याने महिला, शालेय मुली यांच्या सुरक्षितेबद्दल घ्यावयाची काळजी, स्वसंरक्षण , तसेच प्राचार्य,मुख्याध्यापक,शिक्षक यांची जबाबदारी, कर्तव्य, सामाजिक बांधिलकी इत्यादी बाबत बिराजदार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एकटे शासन किंवा पोलीस यंत्रणा पुरेशी होऊ शकत नाही त्यासाठी समाजातील विविध घटकांचे सहकार्य महत्त्वाचे असते. शिक्षक हा समाजातील महत्त्वाचा घटक असून आपण सर्वांनी आदर्श समाज घडवण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन केले. निर्भया पथक, 181 हेल्पलाईन, अभया हा पोलिसांचा पथदर्शी उपक्रम, महिला व शालेय मुली सुरक्षा बाबतच्या विविध उपाययोजना इत्यादी बाबत सखाराम बिराजदार यांनी मार्गदर्शन केले. क्रांतिवीर शैक्षणिक संकुलांतर्गत पुरवलेली पुरेशी सीसीटीव्ही यंत्रणा, आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा , शालेय विद्यार्थ्यांमधील शिस्त, शाळा व्यवस्थापनाची उपक्रमशीलता, संकुलातील उच्च शैक्षणिक दर्जा, याबाबत बिराजदार यांनी समाधान व्यक्त करून क्रांतिवीर शैक्षणिक संकुल एक आदर्श संकुल ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली.
        यावेळी मुख्याध्यापिका सुलोचना बाबर यांनी प्रस्ताविक करून क्रांतीवीर शैक्षणिक संकुलातील आदर्श उपक्रमाची , तसेच मुलींच्या सुरक्षिततेबाबत राबवलेल्या उपक्रमाची तपशीलवार माहिती दिली.यावेळी महिला पोलीस रूपाली फडतरे यांनी निर्भया पथक बाबत मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मुख्याध्यापिक अनिल माने यांनी व्यक्त केले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!