वाढलेली उष्णता आणि कमी होणारी पाणीपातळी यामुळे आठ तालुक्यांत सध्या टॅंकरने पाणी पुरवठा सुरू
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
By: सकाळ वृत्तसेवा
सातारा : वाढलेली उष्णता आणि कमी होणारी पाणीपातळी यामुळे आठ तालुक्यांत सध्या टॅंकरने पाणी पुरवठा सुरू आहे. सध्या २१ टॅंकरद्वारे २२ गावे व ७१ वाड्यांवरील २६ हजार ८०९ लोकसंख्येला पाणीपुरवठा केला जात आहे.
सर्वाधिक माण तालुक्यात नऊ, कऱ्हाड तालुक्यात चार टॅंकर सुरू आहेत. पाणी टंचाईच्या झळा कमी करण्यासाठी काही ठिकाणच्या २२ विहिरी व १५ बोअरवेल अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. जलसंधारणाची कामे, जलयुक्त शिवारची यशस्वी अंमलबजावणी यामुळे जिल्ह्यात टंचाईच्या झळा कमी झाल्याचे चित्र आहे.
पूर्वी दोनशे ते साडेतीनशे टॅंकरने पाणी पुरवठा केला जात असे. यामध्ये माण, खटाव, फलटण व खंडाळा तालुका आघाडीवर होता; पण मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीत वाढ होऊन मे महिन्यात कोरडे होणारे तलाव व विहिरीत आजही पाणी शिल्लक आहे.
सध्या जिल्ह्यात २२ गावे व ७१ वाड्यांना टंचाईच्या झळा बसल्या आहेत, त्यामुळे येथे टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यासाठी २१ टॅंकर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये माण तालुक्यात नऊ, खटाव एक, वाई दोन, पाटण एक, जावळी दोन, महाबळेश्वर एक, सातारा एक, कऱ्हाड तालुक्यात चार टॅंकर सुरू आहेत.
यामध्ये माणमधील दहा गावे व ६३ वाड्या, खटाव तालुक्यातील एक गाव, वाई तालुक्यातील दोन गावे, दोन वाड्या, पाटण तालुक्यातील एक वाडी, जावळी तालुक्यातील दोन गावे व एक वाडी, महाबळेश्वरमधील एक गाव, एक वाडी, सातारा तालुक्यातील एक गाव तीन वाड्या, तसेच कऱ्हाड तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे.
आठ तालुक्यांतील २६ हजार ८०९ लोकसंख्येला टॅंकरने पाणी पुरवले जात आहे. यामध्ये सर्वाधिक लोकसंख्या माण तालुक्यातील १५ हजार २१२ इतकी आहे. खटाव १२००, वाई २७९७, पाटण ५४०, जावळी २०७३, महाबळेश्वर ८५३, सातारा ६२४, कऱ्हाड ३५०७ लोकसंख्येचा समावेश आहे. ४५३३ पशुधन बाधित झाले आहे.
माण दोन, खटाव एक, कोरेगाव दोन, वाई पाच, पाटण एक, जावळी तीन, महाबळेश्वर दोन, कऱ्हाड सहा, तसेच कऱ्हाडमधील दोन तर खटाव तालुक्यातील १३ बोअरवेल अधिग्रहित करण्यात आले आहेत.