सध्या गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या प्रमुख सणांच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सामाजिक शांतता भंग करणारे आणि वारंवार गुन्हे करणाऱ्या १४ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करून सार्वजनिक शांततेस अडथळा आणणाऱ्या गुन्हेगारांचा प्रांताधिकारी उज्वला गाडेकर (उपविभागीय अधिकारी माण-खटाव) यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर कार्यवाही करत मा. प्रांताधिकारी गाडेकर यांनी १४ सराईत गुन्हेगारांना माण तालुक्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले.
तडीपार करण्यात आलेले गुन्हेगार पुढीलप्रमाणे आहेत: स्वप्नील पाटोळे (राजवडी), अजय उर्फ सोन्या गुजले (गोंदवले बुद्रुक), शरद पांढरे (वावरहिरे), बाबुराव पवार (मलवडी), अंकुश चव्हाण (मलवडी), योगेश माने (पिंगळी बुद्रुक), शेखर अवघडे (गोंदवले बु.), काळाराम मदने (शिंगणापुर), शिवाजी बोडरे (सोकासन), जिवन जाधव (नखणे), प्रदीप धर्माधिकारी (वावरहिरे), लहुराज चव्हाण (मलवडी), दिपक मसुगडे (नवलेवाडी), सचिन माने (गोंदवले बुद्रुक).
या निर्णयामुळे गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शांततेत पार पाडण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
या कठोर कारवाईमुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, स्थानिक शांततेसाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत.