शिवाजी विद्यापीठ नामविस्तार मुद्द्यावर गोंधळ – सभागृहात तीव्र विरोध
व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
सातारा कराड प्रतिनिधी
कुलदीप मोहिते
शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या प्रस्तावास विद्यापीठ सिनेट सदस्यांचा तीव्र विरोध आहे. या विषयावर मांडलेल्या स्थगन प्रस्तावाला चर्चेविना मंजुरी देण्यात आल्याने सभागृहात मोठा गोंधळ उडाला.
शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेवेळीच (1962) त्याच्या नावावर बरीच चर्चा झाली होती. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या पुढाकाराने विद्यापीठाची स्थापना झाली. त्यावेळीही “छत्रपती शिवाजी विद्यापीठ” की “शिवाजी विद्यापीठ” असा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेरीस, “शिवाजी विद्यापीठ” हे नाव कायम ठेवण्यात आले.
परंतु, गेल्या काही दिवसांपासून नामविस्ताराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर, सिनेट सदस्य अभिषेक मिठारी यांनी नामविस्तारास विरोध दर्शवित स्थगन प्रस्ताव मांडला. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी चर्चेविना तो स्वीकारल्याने विरोधकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. सभागृहात घोषणाबाजी करण्यात आली, तसेच निषेध फलक झळकावून नामविस्तारास विरोध करण्यात आला.
सभागृहात मांडलेल्या भूमिकेनुसार, “शिवाजी” हे नाव प्रेरणादायी आणि ऐतिहासिक असल्याने त्याचा कोणताही शॉर्ट फॉर्म अथवा बदल होऊ नये, अशी मागणी करण्यात आली. “सूर्य-चंद्र-तारे असतील, तोपर्यंत ‘शिवाजी विद्यापीठ’ हेच नाव कायम राहिले पाहिजे” अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.
दरम्यान, अर्थसंकल्प अधिवेशनात ₹6005 कोटींच्या संभाव्य बजेटवर चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या हितासाठी पायाभूत सुविधा, संशोधन प्रकल्प, वसतिगृह, आणि विविध महत्त्वपूर्ण योजनांवर सखोल चर्चा झाली. एकूण 58 ठरावांपैकी 12 ठराव मंजूर करण्यात आले, तर 46 ठराव मागे घेण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील सिनेट सदस्य अमित जाधव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “विद्यापीठाच्या नावात कोणताही बदल मान्य होणार नाही. शिवाजी विद्यापीठ हेच नाव कायम ठेवले जावे.”
नामविस्ताराच्या मुद्द्यावर विद्यापीठ परिसरात आणि समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.