*कराड, दि. २६: महाराष्ट्रातील लिंगायत समाजाचे राजकीय व सामाजिक हक्क प्रस्थापित करण्यासाठी लातूर येथे २१ व २२ सप्टेंबर रोजी लिंगायत हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष व लिंगायत समाजाचे नेते काका कोयटे यांनी या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
कराड येथे झालेल्या लिंगायत समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कोयटे बोलत होते. त्यांनी लिंगायत समाजाची संख्या राज्यातील एकूण लोकसंख्येच्या ८ टक्के असतानाही समाजाला राजकीय सत्तेत भागीदारी मिळत नसल्याचे मुद्दे उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, लिंगायत समाजाने गेल्या दहा वर्षांत विविध मागण्यांसाठी राज्य सरकारकडे निवेदने दिली असून मोर्चेही काढले आहेत. मात्र, अपेक्षित यश मिळाले नसल्याने पुन्हा एकदा संघर्ष उभारण्याची गरज आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार बटाणे होते. यावेळी प्रदीप वाले, सागर कस्तुरे, श्रीनिवास कांबळे, नानासाहेब कस्तुरे यांच्यासह इतर मान्यवरही उपस्थित होते. राजीव खलीपे यांनी प्रास्ताविक केले, तर राजू शेटे, दत्तात्रय तारळेकर, गुरुदत्त कचरे, दीपक चिंगळे आणि सुनील महाजन यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तात्या शेटे यांनी आभार प्रदर्शन केले.