व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला ) विजयकुमार ढालपे गोंदवले, ता.१४ :
येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात भाविकांना प्रसाद बंद करण्यात येणार नसून नेहमीच्या नियोजनात बदल करण्यात आला असल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना श्रीराम नामाबरोबरच अन्नदानाची खूप आवड होती.श्रीरामनाम घेताना भक्तांना भुकेची अडचण येऊ नये याची पुरेपूर काळजी ते घेत.आपल्याकडे येणाऱ्या भक्ताला ते पोटभर जेवायला घालीत.श्रींचा श्री अन्नदानाचा हाच वारसा समाधी मंदिर समितीकडून आजही गोंदवल्यात अविरतपणे जपला जात आहे.कोरोना काळातही समाधी मंदिर समितीने या सेवाभावामध्ये खंड पडू दिला नाही.जिल्ह्यासह परजिल्ह्यातील गरजूंना अन्नदान करून सेवा बजावली होती. सध्या मात्र समाधी मंदिरात पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रसादालयाच्या नूतनिकरणाचे काम देखील हाती घेण्यात आले आहे.त्यामुळे अन्नदानाच्या नियोजनात बदल करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
श्रींची अन्नदानाची परंपरा सुरूच ठेवून यामध्ये काहीसा बदल करण्यात आला आहे.या नियोजनानुसार श्रींच्या समाधी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अल्प प्रमाणात प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.याशिवाय परगावी जाणाऱ्या भाविकांसाठी प्रसादाच्या बंदिस्त पाकिटांचे वाटप करण्यात येणार आहे. प्रसादालयाच्या नूतनिकरणाचे काम दीर्घ काळ चालणार असल्याने तीन टप्प्यात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.पहिल्या टप्प्याचे काम येत्या गुरुपौर्णिमा उत्सवापूर्वी (जुलै) पूर्ण करण्याचे नियोजन आहे.तर श्रींच्या येत्या पुण्यतिथी महोत्सवापूर्वी दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण करायचे नियोजन आहे. गुरुपौर्णिमा व पुण्यतिथी महोत्सवाच्या कालावधीत समाधी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी दररोज पुर्ण प्रसाद देण्याची व्यवस्था समाधी मंदिर समिती करणार आहे.तिसऱ्या टप्प्याचे काम पुण्यतिथी महोत्सवानंतर लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.भाविकांनी या नूतनीकरण्याच्या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन मंदिर समितीने केले आहे. —————- समाधी मंदिरातील प्रसादालयात भाविकांना अधिक चांगली सेवा मिळावी म्हणून समाधी मंदिर समिती प्रयत्न करत आहे.याचाच भाग म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रसादालयाच्या नूतनिकरणाचे काम आता हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच सर्व सुविधांयुक्त प्रशस्त प्रसादालय पूर्ण होणार आहे. —————- पिंगळी तलाव परिसरात असलेल्या विहीरीतुन समाधी मंदिरात पाणीपुरवठा होतो.परंतु सध्या या विहिरीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्याने तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.त्यामुळे पाण्याचा कमीत कमी वापर करण्याचे आवाहन मंदिर समितीने केले आहे.
—————–