भुमीअभिलेख कार्यालय असुन अडचण, नसुन खोळंबा, सामान्यांचा मात्र नुसताच खेळखंडोबा |
व्हिजन२४ तास न्युज (संपादक:अहमद मुल्ला )
By:महेश कांबळे
म्हसवड :
माण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आपल्या विविध दाखल्यासाठी, उतार्यासाठी व वारसनोंदीसाठी महत्वाचे असणार्या भूमि अभिलेख कार्यालयातील सावळ्या गोंधळाचा मोठा फटका बसत असुन या कार्यालयात वर्षानुवर्ष सामान्य जनतेची कामेच होत नसल्याने हे कार्यालय म्हणजे असुन अडचण अन् नसुन खोळंबा असे झाले आहे, तर येथील अधिकार्यांच्या व कर्मचार्यांच्या मनमानी कारभारामुळे सामान्य जनतेच्या कामाचा मात्र पुरता खेळखंडोबा झाल्याची वस्तुस्थिती आहे.
सरकारी काम अन् चार दिवस थांब अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे, ही म्हण प्रचलित पडण्यामागे शासकीय अधिकार्यांची व कर्मचार्यांची कामाबद्दलची उदासीनता हेच प्रमुख कारण आहे. मुळात शासकीय कार्यालये ही सर्वसामान्य जनतेच्या कामासाठी उघडण्यात आली आहेत, मात्र याच शासकीय कार्यालयात सामान्य जनतेलाच उघडे पाडले जात आहे. जो येथील अधिकार्यांना अथवा कर्मचार्यांना दोतोय दाम त्याचे मात्र हमखास होतंय काम अशी या कार्यालयांची कार्यप्रणाली बनल्याने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे.

दहिवडी येथे सध्या कार्यरत असलेले तालुका भुमिअभिलेख कार्यालय ही याला अपवाद नसल्याचे समोर आले असुन सध्या या कार्यालयात सुरु असलेल्या सावळ्या गोंधळाचा मोठा फटका सामान्य जनतेला बसत आहे, येथे कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांच्यामध्ये कसलाही ताळमेळ नसल्याने वर्षानुवर्ष अनेक प्रकरणे प्रलंबीत असल्याने अनेक सामान्य जनता या कार्यालयाकडे वर्षापासुन खेटे मारीत असल्याचे चित्र आहे. संपूर्ण माण तालुक्यातील सामान्य जनता दररोज या कार्यालयाच्या आवारात कामासाठी गर्दी करीत आहे मात्र आज होईल, उद्या होईल अशी आश्वासक उत्तरे येथुन सर्वांनाच दिली जात असुन ही उत्तरे फक्त सामान्य जनतेला दिली जात आहेत, मात्र याठिकाणी एखादा रईसजादा आल्यास त्याच्यासाठी अक्षरशा पायघड्या घातल्या जात आहेत. त्यांच्यासाठी थंड, अथवा चहा मागवला जातो तर त्यांचे काम करुन देण्यासाठी येथील कर्मचार्यांची एकप्रकारे स्पर्धा सुरु राहते. मात्र ही स्पर्धा सामान्य जनतेच्या कामासाठी कधीही दिसत नाही.
म्हसवड येथील एकाने गत दिड वर्षापुर्वी आपल्या वारस नोंदीसाठी प्रकरण दाखल केले आहे मात्र ते प्रकरण दाखल केल्यापासुन संबधीताला उद्या या हे एकच उत्तर या कार्यालयाकडुन दिले जात आहे. वर्षभर हेलपाटे मारल्यानंतर संबधीताने अनेकांकडे याबाबत भेटी देवुन आपले काम करुन देण्यासंदर्भात विनंती केली, संबधित व्यक्तीचे काम हे रितसर असल्याने अनेकांनी या कार्यालयातील संबधितांना सांगितले मात्र कोणी सांगुन काम करतील ते सरकारी कर्मचारी, अधिकारी कुठले. आपण शासकीय कार्यालयात बसतो म्हणजे जनतेवर अधिराज्य गाजवण्यासाठीच असा आविर्भाव या अधिकार्यांचा व कर्मचार्यांचा असल्याने सामान्य जनतेच्या वेळेची, कामाची व त्यांच्या अडचणीची कदर त्यांना नसल्याची वस्तुस्थिती आहे. म्हसवड येथील प्रलंबीत प्रकरणाची आता कागदपत्रेच या कार्यालयातुन गहाळ झाल्याची नवीन माहिती समोर आली असुन वर्षभर ज्या कामासाठी या कार्यालयात हेलपाटे मारत असलेल्या संबधीताला आता तुमची कागदपत्रेच सापडत नसल्याचे येथील कर्मचारी अगदी सहजपणे सांगत असल्याने संबधित व्यक्ती मात्र पुरती हादरुन गेली आहे. ज्या सहजतेने या कार्यालयातुन तुमची कागदपत्रे सापडत नसल्याचे सांगितले जात आहे तेवढ्या सहजतेने सामान्य व्यक्तींना कागदपत्रांची जमवाजमव होते का ? असा प्रश्न येथील अधिकारी, कर्मचार्यांना कधी पडतो का असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेतुन विचारला जात असुन सदरच्या कार्यालयातुन जर सर्वसामान्यांची कामेच होत नसतील तर मग असे बिनकामी कार्यालयच शासनाने बंद करावे अशी एकमुखी मागणी सामान्य जनतेतुन आता होवु लागली आहे.
चौकट –
सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला असुन त्यामध्ये एक सरपंच आपले काम होत नसल्याने त्या कार्यालयाच्या आवारात कार्यालय प्रमुखाच्या विरोधात रस्त्यावर नोटांची उधळण करीत असल्याचे दिसत आहे, याची गंभीर दखल संबधित मंत्र्यांनी घेवुन तात्काळ त्या कार्यालयातील संबधित अधिकार्याचे निलंबन ही केले. माण तालुक्यात असलेल्या या कार्यालयाच्या भोंगळ कारभारचा निषेध म्हणुन आपणही सर्व कागदपत्रांची या कार्यालयाच्या आवारात उधळण करणार असल्याचे म्हसवड येथील कैलास भोरे यांनी सांगितले आहे.