म्हसवड …प्रतिनिधी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी तर्फे आयोजित भारत जोडो न्याय यात्रा साठी राज्य सहसमन्वयक म्हणून किसान काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष पंजाबचे विरोधी पक्ष नेते आमदार सुखपाल सिंग खैरा यांनी महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे अध्यक्ष पराग पष्टे यांची मुख्य समन्वयक ,तर प्रा. विश्वंभर बाबर यांच्यासह 15 पदाधिकाऱ्याची किसान काँग्रेस अंतर्गत महाराष्ट्र राज्य सहसमन्वयक तर इतर दहा पदाधिकाऱ्याची जिल्हा समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा सुरू आहे.या महत्वपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ मणिपुर राज्यातून झाला असून शेवट महाराष्ट्रात मुंबई येथे होणार आहे. राज्यात नंदुरबार ,धुळे, जळगाव, नाशिक, ठाणे जिल्ह्यातून भारत जोडो न्याय यात्रा जाणार आहे. मुंबई येथे महा सभेच्या माध्यमातून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत न्याययात्रेचा समारोप होणार आहे. सदर यात्रा यशस्वी करण्यासाठी समन्वय समिती महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यात काम करणार असल्याचे प्रा. बाबर यांनी सांगितले मुंबई येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महाराष्ट्र किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे,काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी नवीन जबाबदारी बद्दल विश्वंभर बाबर यांचे अभिनंदन केले.