अँग्रो फार्मर्स फेड प्रोड्युसर लिमिटेड कंपनी देशात अप्रेसर कंपनी म्हणून निश्चितच नावलौकिक मिळवेल, : महादेव जानकर
व्हिजन २४ तास न्युज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड
केवळ सरकारी अनुदान मिळते म्हणून माझ्या आईच्या नावे माता गुणाई अँग्रो फार्मर्स फेड प्रोड्युसर लिमिटेड कंपनी येथील शेतकऱ्यांनी स्थापन केली नसून तो केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन केली आहे. ही कंपनी देशात अप्रेसर कंपनी म्हणून निश्चितच नावलौकिक मिळवेल, असा विश्वास राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
येथील ३१० शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या माता गुणाई अँग्रो फार्मर्स फेड प्रोड्युसर कंपनी लिमिटेड या कंपनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचे हस्ते आज फित कापून करण्यात आले. यानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आमदार जयकुमार गोरे, माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, माऊली सलगर, वैशाली वीरकर, अभयसिंह जगताप, बाळासाहेब काळे, राजकुमार पाटील, बाळासाहेब मासाळ, पृथ्वीराज राजेमाने, प्रांताधिकारी उज्ज्वला गांडेकर, तहसीलदार श्रीशैल्य व्हट्टे, विलासराव माने, भगतसिंह वीरकर, मामुशेठ वीरकर, आप्पा पुकळे, माता गुणाई ॲग्रो फार्मर्स फेड प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष बबन वीरकर, उपाध्यक्ष दादासाहेब दोरगे आदी उपस्थित होते.
आ.जानकर म्हणाले, “शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारने देशभरात दहा हजार शेतकरी प्रोड्युसर कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये महाराष्ट्रात १८०० कंपन्या स्थापण्याचा केंद्राचा निर्णय झाला होता. राज्याच्या तुलनेत ही संख्या कमी असल्याची बाब मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यास सांगितले. मी त्यांनाही भेटलो. त्यांनी माझी मागणी मान्य करून तीन हजार ३०० कंपन्यांस मंजुरी दिली. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची एकत्रितपणे कंपनी मार्फत विक्री केली जाते.”
या कार्यक्रमास उपस्थित रासप, भाजप, राष्ट्रवादी व इतर पक्षाचे व्यासपीठावर एकत्र आलेले नेते पाहून माणच्या विकासासाठी सर्व जण एकत्रित आले असल्यामुळे तालुक्याचा निश्चितच विकास होईल, अशी कोपरखळी श्री. जानकर यांनी या वेळी मारली.
आमदार गोरे म्हणाले, ” माणमधील शेती , पाणीप्रश्न मार्गी लागला आहे. उरमोडी, टेंभू, तारळीचे पाणी आले आहे. आता जिहे कठापूरचे काम महिन्याभरात पूर्ण होणार असून, त्याचेही पाणी उर्वरित गावांना मिळणार आहे. पुढच्या मंगळवारी माणमधील उर्वरित गावांना पाणी देण्यासाठीच्या योजनेच्या कामाच्या प्रारंभासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत. येत्या सहा महिन्यांत ४२ गावांना पाणी मिळणार आहे. “
माता गुणाई ॲग्रो कंपनीप्रमाणे कंपन्या स्थापन करून गट शेतीचे प्रयोग करणे गरजेचे आहे, असे प्रभाकर देशमुख म्हणाले. या वेळी रुचेश जयवंशी, अनिल देसाई, अभय जगताप, दादासाहेब दोरगे, बबन वीरकर यांचीही भाषणे झाली.