दर साल दर वर्षी प्रमाणे अखंड सौभाग्यवती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चाफळ येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी मोठ्या संख्येने महिला येत असतात. सीता माईची यात्रा येत्या १५ जानेवारीला आहे. त्या अनुषंगाने सर्व शासकीय विभागांनी समन्वय साधून सीतामाई यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन तहसीलदार रमेश पाटील यांनी केले आहे.
तीर्थक्षेत्र चाफळ ता.पाटण सीतामाई यात्रा नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील,सहाय्यक गटविकास अधिकारी जे. एस.वाघ,वितरणाच्या अधिकारी प्रज्ञा जाधव, मंडल अधिकारी प्रकाशराव गाडे, वाहतूक नियंत्रक विजय कांबळे, विस्तार अधिकारी जे. बी. दळवी, ग्रामसेवक राजेंद्र चोरगे, उपसरपंच सुरेश काटे,विश्वस्त एल.एस.बाबर, पोलीस पाटील सागर चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन भोसुरे, तलाठी महेश घोरपडे अमोल पांचाळ, ज्योती कोठुळे,व्यवस्थापक भा.मा सुतार तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तहसीलदार पाटील म्हणाले की यात्रेसाठी येणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच एसटी प्रवासात महिलांना दिल्या गेलेल्या सवलतीमुळे यंदा यात्रेसाठी येणाऱ्या महिलांची संख्या ही वाढण्याची शक्यता आहे.असे गृहीत धरून श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनासाठी बॅरिकेट,पिण्याच्या पाण्याची सोय,व गाड्यांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. ववसा पूजन सोय सभागृह व बकुळीची झाडे परिसरात केली आहे. तसेच नियोजन करण्यासाठी श्री समर्थ विद्यालयाचे १००आरएसपी चे पथक कार्यरत राहणार आहे. यात्रा काळात चाफळ ला पाटण आगारातून १० कराड आगारातून १० व बाहेरील आगारातून २५ज्यादा एसटी बसेसची सोय करण्यात आली असल्याची माहिती वाहतूक नियंत्रक विजय कांबळे यांनी दिली. ग्रामपंचायतच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व स्टॉल बसवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामसेवक राजेंद्र चोरगे यांनी दिली.१४व१५ जानेवारी या दोन्ही दिवशी वीज पुरवठा सुरळीत ठेवला जाणार असल्याची माहिती वीज वितरण अधिकारी प्रज्ञा जाधव यांनी सांगितले. यावेळी प्रास्ताविक व स्वागत विश्वस्त एल. एस बाबर यांनी केले. तर आभार बा.मा सुतार यांनी मानले.