अलका कुबल २७ वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर! ‘वजनदार’ नाटकातून रंगमंचावर दमदार पुनरागमन

बातमी Share करा:

 

व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
गणेश तळेकर
मुंबई : प्रतिनिधी
मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल तब्बल २७ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. ‘अष्टविनायक’ आणि ‘विप्रा क्रिएशन्स’ यांची निर्मिती असलेल्या ‘वजनदार’ या नाटकाच्या निमित्ताने त्या पुन्हा रंगमंचावर झळकणार आहेत. यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे २४ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.

लठ्ठपणासारख्या संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या या नाटकात अलका कुबल एका ‘वजनदार’ भूमिकेत दिसणार आहेत. या नाटकाचे लेखन संपदा कुलकर्णी-जोगळेकर यांनी केले असून दिग्दर्शन संतोष वेरूळकर यांचे आहे. अलका कुबल यांच्यासोबतच संपदा कुलकर्णी-जोगळेकर, अभिषेक देशमुख, साक्षी पाटील, अभय जोशी, पूनम सरोदे यांच्याही भूमिका नाटकात पाहायला मिळणार आहेत.

अलका कुबल म्हणाल्या, “२७ वर्षांपूर्वी ‘साष्टांग नमस्कार’ नाटकात काम केले होते. त्यानंतर रंगभूमीपासून दूर होते पण मनात नाटकाची ओढ होतीच. ‘वजनदार’ नाटकाच्या रूपाने एक दमदार विषय आणि संधी मिळाली आहे. प्रेक्षक ही भूमिका नक्कीच एन्जॉय करतील.”

या नाटकाचे संगीत मंदार देशपांडे यांनी दिले असून, नेपथ्य सचिन गावकर यांचे आहे. प्रकाश योजना अमोघ फडके, वेशभूषा हर्षदा बोरकर आणि रंगभूषा कमलेश बिचे यांची आहे. निर्मिती संध्या रोठे, प्रांजली मते आणि दिलीप जाधव यांनी केली आहे.

‘वजनदार’ नाटकातून एक सामाजिक संदेश देतानाच प्रेक्षकांना हसवत अंतर्मुख करणारा अनुभव मिळणार आहे. अलका कुबल यांचे हे दमदार पुनरागमन नाट्यरसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

 


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!