व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
म्हसवड, ११ नोव्हेंबर: सातारा जिल्ह्यातील माण-खटाव विधानसभा क्षेत्रात यंदाच्या निवडणुकीत परिवर्तनाची प्रचंड लाट आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांना सामान्य जनतेकडून मोठा प्रतिसाद लाभत आहे. प्रभाकर घार्गे यांच्या प्रचारासाठी काढलेल्या मतदार संवाद यात्रेत नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
या यात्रेत राष्ट्रवादी पवार पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष आणि प्रभाकर देशमुख यांचे समर्थक किशोर सोनवणे यांनी आपले विचार मांडले. “यंदा विधानसभेत परिवर्तन घडवायचेच! प्रभाकर घार्गे यांच्या विजयाची लढाई कोणीही थांबवू शकणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यावेळी प्रभाकर देशमुख, उमेदवार प्रभाकर घार्गे, अनिल देसाई, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, भगतसिंह विरकर, जयसिंह राजेमाने, अँड. पृथ्वीराज राजेमाने, महादेव मासाळ, सचिन माने, चंद्रकांत केवटे, इंजि. बाळासाहेब माने आणि इतर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
गेल्या १५ वर्षांतील मागासलेपणाचा मुद्दा
सोनवणे यांनी आपल्या भाषणात गेल्या १५ वर्षांत माण-खटावच्या विकासाचा मुद्दा उचलून धरला. “येथील लोकप्रतिनिधींनी क्षेत्राला मागास ठेवण्यासाठीच काम केले आहे. दुसऱ्यांच्या कामाचे श्रेय घेणे हाच त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. परंतु, प्रभाकर घार्गेसारखा लोकप्रतिनिधी माण-खटावच्या जनतेला लाभल्यास, जाती-पातीच्या राजकारणाला आळा बसेल,” असे त्यांनी सांगितले.
सोनवणे म्हणाले, “माण तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी दरवर्षी पाण्याचे आवर्तन आणून त्याचे पूजन करून सामान्य जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे. मात्र, आजपर्यंत माणमध्ये एकही उद्योग उभारला नाही. या अपयशाला येथील लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत.”
माणमध्ये औद्योगिक क्रांतीसाठी सजगतेचे आवाहन
औद्योगिक क्रांतीचा मुद्दा मांडताना सोनवणे यांनी खटावप्रमाणे माणमध्ये देखील उद्योग उभारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. “माणच्या सुज्ञ जनतेने आता सजग होऊन मतदान करावे, स्वाभिमान जपत प्रत्येकाने डोळसपणे निर्णय घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
माण-खटावला एका नव्या युगाकडे नेण्याचे स्वप्न
प्रभाकर घार्गे यांच्या विजयाने माण-खटाव क्षेत्राला एका नव्या युगाकडे नेण्याचे स्वप्न दाखवले जात आहे. सामान्य जनतेला विकासाच्या प्रवाहात आणून स्थैर्य व समृद्धीकडे वाटचाल करण्याची संधी आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या विजयामुळे या क्षेत्रात आर्थिक व सामाजिक प्रगतीचा वेग वाढण्याची अपेक्षा आहे.
म्हसवडमधील नागरिकांना प्रभाकर घार्गे यांचा विजयरथ रोखू शकणार नाही, असा दृढ विश्वास त्यांचे समर्थक बाळगून आहेत.