शिंगणापूर यात्रेत शिवपार्वती विवाहसोहळा उत्साहात साजरा.. धज सोहळाही उत्साहात; लाखो भाविकांची उपस्थिती
व्हिजन २४ तास न्युज म्हसवड (संपादक :अहमद मुल्ला )
By:दौलत नाईक
दहिवडी/प्रतिनिधी:
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर यात्रेत बुधवारी लाखो भाविकांच्या उपस्थितीत शंभू महादेव मंदिर ते अमृतेश्वर मंदिराच्या कळसास मानाचे पागोटे बांधण्याचा सोहळा उत्साही वातावरणात पार पडला. तर रात्री उशिरा मंगलमय वातावरणात शिवपार्वती विवाहसोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
शिंगणापूर यात्रेत चैत्र शुद्ध अष्टमीच्या दिवशी मानाचे पागोटे (धज) बांधण्याचा नयनरम्य सोहळा मंगलमय वातावरणात पार पडला. बुधवारी दुपारी मानाच्या पागोट्यांचे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सारिका शेंडे यांनी स्वागत केले. त्यानंतर सर्व पागोटी वाजतगाजत शंभू महादेव मंदिरापर्यंत आणण्यात आली. मंदिरात आल्यानंतर संभाजी धजकरी (आवसगाव जि बीड), विलास धजकरी (खामसवाडी जि. उस्मानाबाद), अशोक साळी (कोळगाव जि. अहमदनगर) तसेच महाराष्ट्र राज्य कोळी महासंघ या सर्व धजींचे देवस्थानचे व्यवस्थापक मंदार पत्की यांच्यासह सर्व सेवाधारी यांनी विधिवत पद्धतीने पूजन केले. लाखो भाविकांच्या उपस्थितीत हरहर महादेव जयघोषात शंभू महादेव मंदिरापासून अमृतेश्वर मंदिराच्या कळसास मानाचे पागोटे-धज बांधण्याचा सोहळा पार पडला. जवळपास दीड तास चाललेल्या धज बांधण्याच्या नयनरम्य सोहळ्याच्या वेळी उपस्थित भाविकांनी टाळ्यांच्या गजरात, हरहर महादेव जयघोष करत आनंदोत्सव साजरा केला.
त्यानंतर रात्री बारा वाजता शंभू महादेव मंदिराच्या पाठीमागे असलेल्या बोहोल्यावर विष्णूलक्ष्मीच्या साक्षीने शिवपार्वती विवाहसोहळा पार पडला. वधू-वरांकडील बडवे, जिरायतखाने यांच्यासह महाराज सरकार, चारचौथाई, बडवे, जंगम, पाटील, चौधरी, शेटे, साळी, दांगट, गुरव, कोळी, घडशी आदी मानकऱ्यांच्या उपस्थितीत सनई, चौघडा, शिंगतुतारी, ढोलताशांच्या मंगल सुरात विवाहसोहळा संपन्न झाला. यावेळी गुलाबी रंगाची तसेच ज्वारीच्या अक्षतांची उधळण करून मंगलाष्टके म्हणून मंगलमय वातावरणात विवाहसोहळा संपन्न झाला. शंभू महादेवाच्या विवाह सोहळ्यासाठी मराठवाडा, विदर्भ, खानदेशातून उपस्थित असलेल्या लाखो वऱ्हाडी भाविकांमध्ये उत्साह दिसून येत होता. धजसोहळा व विवाहसोहळ्यासाठी सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिनांक १ व २ एप्रिल यात्रेचे मुख्य दिवस असून भाविकांच्या गर्दीने शिंगणापूरनगरी फुलली आहे.