विद्यार्थ्यानो चांगला माणूस बना:-डॉ. भारती पोळ

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्युज म्हसवड
BY :विठ्ठल काटकर
 कुकुडवाड/वार्ताहर:
               सद्याच्या स्पर्धेच्या युगात शिक्षण अतिशय महत्वाचे असून तुम्ही शिका, संघर्ष करा, मात्र त्याबरोबर एक चांगला माणूस बना असा मोलाचा सल्ला सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉक्टर भारती पोळ यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना दिला.
 माण तालुक्यातील कै आबासाहेब पोळ शिक्षण सस्थेच्या भालवडी माध्यमिक विद्यालय व जुनिअर कॉलेज मध्ये इयत्ता दहावी शुभचिंतन व बारावी निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून हरिभक्त पारायण दादासाहेब नरळे गुरुजी यांची उपस्थिती होती.
                      डॉक्टर भारती पोळ पुढे म्हणाल्या की प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरच्या परिस्थिची जाण ठेवली पाहिजे, आई वडील किती कष्ट करतात व आपल्याला दोन वेळेच जेवण मिळतं, याचा गांभीर्याने विचार करा व जीवनात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका असे त्यांनी सांगितले. विविध परीक्षा व क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यशस्वी झालं पाहिजे., आयुष्यात संगत चांगली ठेवा, संगतीचा मोठा परिणाम आपल्या जीवनावर होतो त्यासाठी काळजी घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
                  प्रमुख वक्ते दादासाहेब नरळे गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की शिक्षकांनी दिलेले ज्ञानाची कायम जपणूक करा,उच्च ध्येय, निर्मळ विचार, निर्मळ आचार, ठेवा तुम्ही यशस्वी होणारच हा आत्मविश्वास ठेवा.समाजाप्रती परोपकाराची भावना ठेवा, सदाशिवराव पोळ तात्यांनी सामाजिक जाणीव ठेवून काम केलं, तात्या हे नाव चंद्र सूर्य असेपर्यंत पृथ्वीवर नाव गाजत राहील, कारण स्वतःसाठी जगणारी माणसं त्यांची फक्त माती होते, तर समाजासाठी जगणारी माणसं अजरामर होतात. म्हणून सत्कर्माने मोठं व्हा, आई वडिलांचे नाव मोठं करा असे त्यांनी सांगितले.
          यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना बक्षीस व पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला, यावेळी ग्रामस्थांच्या वतीने तुषार जाधव यांनी मनोगत व्यक्त केले, तर शिक्षकांच्या वतीने शिल्पा खासबागे,बळवंत घनवट यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य गजानन पुकळे यांनी केले.कार्यक्रमास भालवडी गावच्या सरपंच हिना मुलाणी, उपसरपंच नितीन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते अरिफ मुलाणी, पोलीस पाटील देवानंद बनसोडे, सेवानिवृत्त विकास अधिकारी  गुलाब काटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशिनाथ जाधव, यांच्यासाह ग्रामस्थ, शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
                              कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी पाटोळे यांनी केले तर संदिप जगदाळे यांनी आभार मानले.

बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: बातमी कॉपी करण्यापेक्षा share करा!!