मोकाट सोडलेल्या गाढवाचा उच्छाद, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान ,शासन याकडे लक्ष देणार का ?
व्हिजन २४ तास न्युज
By:अहमद मुल्ला
म्हसवड
माण तालुक्यातील म्हसवड पालिका हद्दीमध्ये सध्या मोकाट गाढवांनी उच्छाद मांडला असुन ही मोकाट गाढवे शेतकऱ्याच्या उभ्या पिकात शिरुन संपूर्ण पिके खाऊन फस्त करीत असल्याची वस्तुस्थिती आहे, तर याबाबत तक्रार करुन देखीलही प्रशासनाकडुन कोणतीही कार्यवाही होत नसल्याने प्रशासन सुस्त बनले आहे का ? असा संतप्त सवाल शेतकरीवर्गातुन विचारण्यात येत आहे.
लाखांचा पोशींदा म्हणुन ज्या शेतकऱ्या कडे पाहिले जाते सध्या याच शेतकऱ्याच्या व्यथा जाणुन घेण्यात कोणालाही रस नसल्याचे चित्र आहे, खुप मेहनत करुन आपल्या शेतात पिकवलेले धान्य दिवसाढवळ्या मोकाट जनावरांकडुन फस्त होताना पाहुन शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रु तरळत आहेत. शेतकऱ्याच्या डोळ्यात तरळणारे अश्रु मात्र प्रशासनाच्या कोणत्याच अधिकार्याला दिसत नसल्याने बिच्चाऱ्या शेतकऱ्यानी दाद मागावयाची तर कोणाकडे अशी परिस्थिती म्हसवड शहरात झाली आहे.


म्हसवड शहरातील अनेक शेतकऱ्याना शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांचा अन् गाढवांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे, ही मोकाट जनावरे शेतकऱ्याच्या शेतात हातातोंडाशी आलेली ही उभी पिके फस्त करीत आहेत, यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत आहे. शहरात मोकाटपणे फिरणारी गाढवे ही शहरातील काही जनांनी पाळलेली असुन ते लोकं या गाढवांकडुन कामे करुन घेतात व काम संपले की त्यांना मोकाटपणे सोडुन देतात व सायंकाळी पुन्हा त्यांना आपल्या घरी घेवुन जातात,
आमच्या पिकांची होणारी नासाडी बाबत संबधित गाढव मालकांना विचारणा केल्यास ते अरेरावी करीत असल्याचा आरोप शेतकरीवर्गातुन केला जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. याबाबत प्रशासन ही शेतकऱ्याची बाजु ऐकुन घेत नसल्याने शेतकरीवर्ग पुरता हवालदिल झाला आहे. एकीकडी वादळी वारे, गारपिठ, अवकाळी पाऊस या अस्मानी संकटाचे सतत झटके सोसत शेतकरी आपली पिके तळहाताचा फोडाप्रमाणे जोपासत असताना दुसरीकडे अशा गाढवरुपी सुलतानी संकटामुळे हातातोंडाशी आलेली पिके फस्त होताना पाहुन शेतकरीवर्गाची अवस्था मात्र सांगताही येईना अन् सहन ही होईना अशी झाली आहे.