धुळदेव – गारवड इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी ८ हजार एकर जमीन संपादित करण्यासाठी ना. सावंत यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड; प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील धुळदेव व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील गारवड या दोन्ही ठिकाणी बहुचर्चित व प्रस्तावित असणारा मुंबई बेंगलोर इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी धुळदेव व गारवड या ठिकाणची आठ हजार एकर जमीन संपादित करण्यात यावी, असे पत्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मंगळवार दि. १७ जानेवारी २०२३ रोजी दिले आहे.
आरोग्य मंत्री यांनी दिलेल्या पत्रामध्ये अॅड.सोमनाथ वाघमोडे यांच्या दि. १३ जानेवारी २०२३ च्या विनंती पत्राचा संदर्भ देत म्हटले आहे की, केंद्र सरकारचा बहुचर्चित असणारा इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा प्रकल्प हा कर्नाटक व महाराष्ट्रात होत असून कर्नाटक राज्याने बेंगलोर-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी ६ हजार एकर जागा निश्चित केली असून त्याबाबतची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. या उलट महाराष्ट्रात सातारा व सोलापूर जिल्ह्यात इंडस्ट्रियल कॉरिडॉरची जागा निश्चित न झाल्यामुळे केंद्र सरकारला उद्योग व वाणिज्य मंत्रालयाकडून इंडस्ट्रियल कॉरिडॉर ची कारवाई करता आलेली नाही. मात्र, सातारा जिल्ह्यातील धुळदेव व सोलापूर जिल्ह्यातील गारवड या ठिकाणी ८ हजार एकर जागा इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी उपलब्ध असून या ठिकाणची ही जागा देण्यासाठी शेतकरी स्वखुशीने तयार आहेत.

या ठिकाणी इंडस्ट्रियल कॉरिडॉर झाल्यास नोकरीच्या निमित्ताने शहरांकडे होणारे स्थलांतर कमी होऊन स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध होणार आहेत. अगोदरही या इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी अॅड. सोमनाथ वाघमोडे, भानुदास सालगुडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित बोरकर यासह माळशिरस तालुक्यातील अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी केंद्रीय उद्योग मंत्री, अर्थमंत्री याचबरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. उदयनराजे भोसले, ना. तानाजी सावंत, आ. जयकुमार गोरे, आ. महादेव जानकर, आ.गोपीचंद पडळकर यासह अनेकांच्या भेटी घेऊन या कॉरिडॉरसाठी सातत्याने लढा दिलेला आहे. ना. तानाजी सावंत यांनी दिलेल्या पत्रामुळे पुन्हा एकदा माळशिरस तालुक्यातील गारवड व आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.