व्हिजन २४ तास न्यूज (संपादक :अहमद मुल्ला )
मुंबई, : मूक-बधिर मुलांना आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासी बनवण्याचे उत्कृष्ट कार्य करणारे टीच संस्थेचे संस्थापक अमन शर्मा यांना १५ वा केशव सृष्टी पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते विले पार्ले येथील राजपुरीया हॉल येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
टीच ही संस्था मूक-बधिर मुलांना उच्च शिक्षण आणि विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षित करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम करते. या कार्याची दखल घेत, अमन शर्मा यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला. एक लाख रुपये, मान पत्र, मानचिन्ह आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार सोहळ्यावेळी बोलताना डॉ. निरगुडकर म्हणाले, “समाजात काही माणसे गाजणारी असतात, तर काही प्रत्यक्ष कार्य करणारी असतात. अमन शर्मा यांनी मूक-बधिर मुलांच्या जीवनात बदल घडवून आणला असून, त्यांनी प्रत्येक मुलात आशेचा किरण दिला आहे.”
टीच संस्थेची स्थापना २०१६ मध्ये झाली असून, सध्या मुंबई, पुणे, आणि दिल्ली येथे त्यांच्या शाखा आहेत. या संस्थेतील मुलांनी आपल्या वैगुण्यावर मात करत विविध कौशल्यांचे शिक्षण घेतले आहे.
पुरस्कार निवड समितीमध्ये ११ महिलांचा समावेश होता, ज्यामध्ये केशवसृष्टीच्या माजी अध्यक्षा डॉ. अलका मांडके, माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, उद्योजिका हेमा भाटवडेकर आणि पत्रकार वैजयंती आपटे यांचा समावेश होता. कार्यक्रमाच्या शेवटी राधा पेठे यांच्या “पसायदान” गीताने समारोप करण्यात आला